Where Reality Meets Mystery…!
भुकेला… A Truth Behind Human
रणरणत्या उन्हात पावलं जागची हालत नव्हती आणि खाली टेकवत ही नव्हती. प्रचंड विरोधाभास !
उन्हाचा तडाखा इतका जबरदस्त होता की, ऊनच काय मातीही चटके देत होती !
आणि अशातच एक जण उन्हा-तान्हात भटकत होता…पोटात भूकेचा आगडोंब उसळला होता ,शरीरात त्राण राहिलं नव्हतं. त्यामुळे एक एक पाऊल मोठ्या मुश्कीलिने पडत होतं. भूकेने व तहानेने जीव कासाविस झाला होता, पायाला बसणाऱ्या चटक्यांनी शरीरातलं आहे नाही ते पाणी संपत चाललं होतं ,सावलीसाठी एखादं झाड़ शोधावं तर बाभळीशिवाय एकहि झाडाची या उन्हात तग धरायची हिम्मत नव्हती.
ज्या झाडांनी हिम्मत केली ,त्यांची मनुष्य प्राण्याने स्वकार्यासाठी किंवा सत्कार्यासाठी कत्तल केली, काटछाट केली.
अंगावरचे कपडे मळके ,घाणेरडे, जीर्ण झालेले. अंघोळ नसलेलं शरीर रोज फक्त घामानेच भिजत होतं, केसांना किती दिवसात तेलच काय ,साधा कंगवाही लागला नव्हता. दाढीचे खुट्टे डुकराच्या केसांसारखे ताठ वाढले होते. त्यांनाही याच्यासारखाच स्वाभिमान असावा.
पोटात भूक मावत नव्हती . शरीराची भूक, मनाची भूक, बुद्धीची भूक, आत्म्याचि भूक,शमत नव्हती.
देवाने नशिबात फक्त आणि फक्त भूकच दिली होती. देवाने जन्म देऊन तरी काय मिळवलं त्या देवालाच माहीत ,आणि जन्मं घेऊन याने काय केलं यालाच माहीत !